छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण माहिती । Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Mahiti

Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Mahiti : सिंहाचा छावा, धर्मवीर म्हणुन इतिहासात ज्यांचे वर्णन केले जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजपुत्राचा, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नेमका काय आहे?

मराठा राज्याचे दुसरे छत्रपती शुर विर आणि विद्वान होते. त्यांनीं राजकारण तर केलेच पण ग्रंथ रचना सुध्दा केली. त्यांनी कोणते ग्रंथ लिहिले? हे आजच्या लेखातून जाणून घेऊ या.

महाराजांनी शेतकऱ्यांचे हित पाहिले. दुष्काळाचा बंदोबस्त केला. जलसिंचन राबवले, न्याय व्यवस्था चोख ठेवली.

अशा या प्रजादक्ष शुर वीर छत्रपती संभाजी महाराजांचा करुण आणि दुर्दैवी अंत कसा झाला? चला तर, आज आपण Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाची ओळख करुन घेऊ या.

Chhatrapati Sambhaji Maharaj इन्फॉर्मशन Marathi Mahiti

जन्म

स्वराज्याचे पहिले छत्रपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांच्यापोटी किल्ले पुरंदर येथे पुत्र जन्माला आला तो शुभ दिवस होता १४ मे १६५७. पुत्राच्या जन्माने स्वराज्याला वारस मिळाला म्हणुन अवघ्या मराठी मुलखात आनंदी आनंद झाला. मात्र हा आनंद संभाजी महाराजांच्या जन्मानंतर दोनच वर्षांनी त्यांच्या मातोश्री सईबाई यांच्या निधनाने फिक्का पडला. अवघ्या दोन वर्षाच्या राजपुत्राच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले. छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण आईविणा सरले. जिजाऊंसोबत पुण्याजवळील कापूरहोळ येथील धाराऊ नावाची महिलेने संभाजी महाराजांचे संगोपन केले.

बालपण

सईबाईंचे छत्र हरपले तरी सावत्र आई पुतळाबाई यांनी शंभूराजांवर सख्या मुलाप्रमाणे माया केली. त्यांच्या दुसऱ्या सावत्र आई सोयरबाईंनी त्यांचा जाच केल्याचे बोलले जाते.

माशाच्या मुलाला पोहायला शिकवावे लागत नाही तसेच शिवाजी महाराजांच्या मुलाला राजकारण आणि शौर्य शिकण्याची गरज होती अशातले मुळीच नाही. संभाजी महाराज जितके देखणे होते जितके शुर आणि राजकारण धुरंदर होते. ते अनेक भाषा शिकले होते. महाराजांच्या सोबत आग्रा भेटीस गेलेल्या ९ वर्षे वयाच्या संभाजी महाराजांनी मुगल दरबारातील राजकारणाचे बारीक निरीक्षण केले होते.

पुढे अगाऱ्याच्या कैदेतून सुटका करुन घेतल्यावर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना मथुरेत मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी ब्राम्हण पूत्र बनवून ठेवले होते. मुघलांचा सासेमिरा टाळण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूची अफवा पसरवून दिली. आपल्या मृत्यूची बातमी ऐकलेले संभाजी महाराज हे एकमेव राजपुत्र असतील.

संभाजी महाराजांच्या विनम्र स्वभावामुळे १६७४ साली शिवाजी महाराजांच्या राज्याभषेकाला रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना संभाजी महाराजांनी आपलेसे करून घेतले होते.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकानंतर बाराव्या दिवशी मासाहेब जिजाऊंचे निधन झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने संभाजी राजे पोरके झाले. महापराक्रमी आणि कर्तृत्ववान छत्रपती शिवाजी महाराज राजकारण आणि लढाया यातच गुंतून राहीले होते. त्यामुळे पुत्राकडे दुर्लक्ष होणे सहाजिकच होते.

तारुण्यात पदार्पण करीपर्यंत संभाजी राजांना राजकारण चांगलेच उमजू लागले होते. त्यामुळे दरबारातील अनुभवी परंतू भ्रष्ट मानकऱ्यांशी त्यांचे मतभेद होऊ लागले. कुशल प्रशासक असेलल्या अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला संभाजी राजांचा विरोध होऊ लागला. त्यामुळे अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजी महाराजांच्या विरोधात गेले. याचा परिणाम असा झाला की दरबारातील मानकरी संभाजी महाराजांना अपमानजनक वागणूक देऊ लागले. शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर गेले असताना त्यांच्या अनुपस्थितीत संभाजी महाराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. या सगळ्या घटनक्रमाचा परिपाक म्हणुन संभाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणुन शिवाजी महाराजांनी पाठवले.

राज्याभिषेक

पुढे मराठा राजकारणाने भलतेच वळण घेतले. सन १६७८ मधे प्रत्यक्ष शिवजी महाराजांनी संभाजीराजांना पन्हाळा येथे बंदिस्त केले. त्यानंतर संभाजीराजे मुघलांकडे गेले. एक वर्षांनी माघारी परतून त्यांनी पुन्हा बंदिवास स्विकारला.

३ एप्रिल १६८० रोजी विषमज्वराने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. तेव्हा सोयराबाईंनी छत्रपती संभाजी महाराजांचा अधिकार नाकारून आपला मुलगा राजारामचा राज्याभिषेक करण्याची योजना आखली. २१ एप्रिल १६८० रोजी अवघ्या दहा वर्षांच्या राजारामला विवीध मंत्र्यांच्या संगनमताने गादीवर बसवण्यात आले. परंतू संभाजी महाराजांनी आपला अधिकार मिळवण्यासाठी १८ जून रोजी रायगडावर ताबा मिळवला आणि २० जुलै रोजी ते सिंहासनावर बसले व १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करुन घेतला.

नाणी

छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःच्या नावाची नाणे पाडली ज्यावर पुढच्या बाजुवर ‘श्री राजा शंभूछत्रपती’ व मागच्या बाजुवर ‘छत्रपती’ अशी अक्षरे कोरली.

राज्याभिषेकानंतर लगेचच बुऱ्हानपुरवर छापा टाकुन त्यांनी एक करोड होनांची दौलत स्वराज्यात आणली. तसेच पुढील आठ वर्षात शिवरायांच्या स्वराज्यात दुप्पटीने वाढ केली, सैन्य आणि खजिना तिपटीने वाढवला.

सन १६७२ च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणारा एक फ्रेंच प्रवासी अबे कॅरे म्हणतो,

“हा युवराज जरी लहान असला तरी धैर्यशील आहे. आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजी महाराजांसारख्या युद्धकुशल पित्यासोबत राहून तो युद्धकलेत तरबेज झाला आहे. चांगल्या वयोवृद्ध सेनापतीही संभाजीमहाराजांशी बरोबरी करु शकणार नाहीत इतके ते तरबेज आहेत. छत्रपती संभाजी राजे मजबूत बांध्याचे असून अतिस्वरुपवान आहे. सैनिकांची त्यांच्यावर खास मर्जी आहे.ते त्यांना शिवरायांसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते.”

संभाजी महाराजांची कारकीर्द अवघी ९ वर्षाची. या ९ वर्षात महाराजानी १२७ लढाया केल्या व १२७ लढाया जिंकल्या.

संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ

छत्रपती संभाजी महाराजांना अनेक भाषा अवगत होत्या. छत्रपती संभाजीं आपल्या हयातीत अनेक ग्रंथ रचले. त्यापैकी बुधभूषणम हा विशेष ग्रंथ आहे. नायिकाभेद , सातसतक , नखशिखा हे आणि अशासारख्या इतर ग्रंथांची रचना संभाजी महाराजांनी केली आहे.

बुधभूषणम या काव्यात्मक ग्रंथात संभाजी महाराजानी राज्याची कर्तव्य लिहिली आहेत. तसेच राजकारण व लष्करी धोरणे याबाबत या ग्रंथात चर्चा केलेली आहे.

संभाजी महाराजांचे कृषी धोरण

सन १६८४ ते १६८८ दरम्यान महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. अशावेळी शिवाजी महाराजाच्या धोरणाची अंमलबजावणी करीत संभाजी महाराजांनी गरीब शेतकऱ्यांना मदत केली. दुष्काळाविरुद्ध लढताना त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाययोजना केल्या. पाणी साठवण, सिंचन, नव्या पीक पद्धती विकसित केल्या. शेतकऱ्यांना धान्य बियाणे, करात सूट, शेती कामासाठी बैल आणि शेतीची अवजारे दिली. लोकांना अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी प्रोत्साहन दिले. तारफ, चौलचे सुभेदार आणि कारकुन हरी शिवदेव यांना ३ जून १६८४ रोजी लिहीलेल्या पत्रात, त्यांचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांना सरकारने जप्त केलेल्या गावांतील शेतजमीन लागवडीखाली आणण्याचे निर्देश दिले. त्यांनी सागर गडावरून हरी शिवदेवांना पाठवलेल्या पन्नास खंडी धान्याचे वाटप करण्यास सांगितले.

महाराजांनी शेतीच्या कामातून महसूल वाढवण्याचा प्रयत्न केला.

संभाजींनी दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना धान्य बियाणे, करात सूट, शेती कामासाठी बैल आणि शेतीची अवजारे दिली.

संभाजी राजांचे प्रधान मंडळ

सिंहासनाधीश्वर श्रीमंत छत्रपती – संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (सेनाधीशांचे सेनाधीश – सर्वोच्च अधिकार असलेले)

श्री सखी राणी जयति छत्रपती येसूबाई संभाजीराजे भोसले (संभाजीराजांच्या गैरहजेरीत राजव्यवस्थेच्या कारभारी)

सरसेनापती – हंबीरराव मोहिते

छांदोगामात्य – कवी कलश

पेशवे – निळो मोरेश्वर पिंगळे

मुख्य न्यायाधीश – प्रल्हाद निराजी

दानाध्यक्ष – मोरेश्वर पंडितराव

चिटणीस – बाळाजी आवजी

सुरनीस – आबाजी सोनदेव

डबीर – जनार्दनपंत

मुजुमदार – अण्णाजी दत्तो

वाकेनवीस – दत्ताजीपंत

संभाजी महाराजांना अटक । Chhatrapati Sambhaji Maharaj Arrest

१ फेब्रुवारी, १६८९ रोजी संभाजी महाराज कोकणातील संगमेश्वर येथून रायगडाकडे रवाना होत असतानाच औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्या माणसांना फितूर करुन संगमेश्वरावर हल्ला केला, मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले.

मृत्यू

मुघलांनी पकडल्या नंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंगजेबापुढे किल्ले बहादुरगड येथे आणले. हाच बहादूरगड आता धर्मवीरगड म्हणून ओळखला जातो.

येथे औरंगजेबाने संभाजी महाराजांना विवीध मागण्या मान्य कराव्यात म्हणुन खुप यातना दिल्या. धर्मांतर केल्यास जीवदान देण्याचे अमिशही दाखवले. मात्र संभाजी महाराज कोणत्याही गोष्टीने बधले नाहीत. त्यानंतर औरंगजेबाने महाराज व कवी कलश यांची मानहानी करणारी धिंड काढली. त्यानेही महाराज बधले नाहीत तेव्हा दोघांना असह्य मरण यातना देत हाल हाल करून क्रूरपणे ठार मारले. स्वराज्याचा एक दैदिप्यमान तारा निखळला तो दिवस होता ११ मार्च १६८९.

Conclusion – Chhatrapati Sambhaji Maharaj

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास म्हणजे सिंधू सागराचे पाणी आहे. ते इवल्याश्या ओंजळीत मावणे शक्य नाही. छत्रपती संभाजी महाराजांचे जितके गुणगान करावे तितके कमीच आहे. या थोर, शुर, पराक्रमी, विद्वान, प्रजा हित दक्ष, दैदिप्यमान कारकीर्द असेलल्या रण झुंजार छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करुन आजच्या लेखाला विराम देत आहोत. आपल्याला हा लेख कसा वाटला ते कमेंट करुन नक्की सांगा. लेख आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.

हे देखील वाचा रायगड किल्ला माहिती मराठी । Raigad Killa Information in Marathi

1 thought on “छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण माहिती । Chhatrapati Sambhaji Maharaj Marathi Mahiti”

Leave a Comment